नागपूर दिनांक.२६ डिसेंबर :- पारशिवनी तालूक्यातील ग्राम पंचायत कांद्रीचे नगर पंचायतमध्ये रुपांतरण करण्याबाबतची अंतिम अधिसूचना शासनाच्या नगर विकास विभागाने जाहीर केली असून ग्राम पंचायत कांद्रीचे नगर पंचायतमध्ये रुपांतरण झाले आहे. प्रक्रीया सुरु असतांनाच राज्य निवडणूक आयोगाने ग्राम पंचायत निवडणूक जाहिर केली होती. ग्राम पंचायत कांद्री चे नगर पंचायतमध्ये रुपांतरण करण्याकरिता अंतीम अधिसुचना जाहीर करण्याबाबत अॅड.आशिष जयस्वाल यांनी दि.२५ नोव्हेंबर, २०२२ रोजी मा.उच्च न्यायालयात याचिका क्र. ७३१९/२०२२ दाखल केली होती व ग्राम पंचायत कांद्री ची निवडणूक थांबविण्यासाठी विनंती केली होती. त्याचप्रमाणे राज्य शासनाने देखिल ग्राम पंचायत कांद्रीचे नगरपंचायतमध्ये रुपांतरण करण्याकरिता निवडणूक आयोगाची नाहरकत मिळविण्याकरीता विनंती केली होती. परंतु राज्य निवडणूक आयोगाने हि विनंती अमान्य केली व ग्राम पंचायत कांद्रीची निवडणूक जाहीर केली होती. त्यामूळे आमदार आशिष जयस्वाल यांनी उच्च न्यायालयात धाव घेत ग्राम पंचायतची निवडणूक रद्द करुन नगर पंचायतची अधिसुचना काढण्याबाबत न्यायालयाकडे मागणी केली. ग्राम पंचायतीची निवडणूक झाल्यास जनतेवर दुहेरी खर्च लागले जाणार आहे व गावाच्या विकासाच्या दृष्टीने हे योग्य नाही. ग्राम पंचायतीची निवडणूक झाल्यास विनाकारण निधिचा खर्च होईल व निवडणूक झाल्यानंतर दोन वर्षापर्यंत नविन नगर पंचायतीचा ठराव घेता येणार नाही व पुनश्च सर्व प्रक्रीया करावी लागेल. यापूर्वी देखील अनेक याचिका न्यायालयापुढे निवडणूक थांबविण्याकरीत याचिका दाखल झाल्या होत्या परंतु त्या सर्व याचिकांना न्यायालयाने फेटाळल्या होत्या. परंतु कांद्री ग्राम पंचायतीच्या निवडणुकीबाबत उच्च न्यायालयाने याचिका कत्यर्यांची बाजू ऐकून ग्राम पंचायत कांद्रीची निवडणूक स्थगीत करण्याबाबत निवडणूक आयोगाला निर्देश दिले होते. कांद्री नगर पंचायत ची नस्ती शासनाकडे प्रलंबित असतांना आमदार आशिष जयस्वाल यांनी उपरोक्त नस्ती चा सतत पाठपुरावा केला. या प्रक्रियेमध्ये कांद्री येथील मनोज पोटभरे, अतुल हजारे, अरुण हजारे, विभा पोटभरे, श्रीराम रहिले, नरहरी पोटभरे, शिवाजी चकोले, श्याम मस्के व इतर नागरिकांनी देखील शर्तीचे प्रयत्न केले. कांद्री ची नगर पंचायत मध्ये रूपांतरण झाल्याने गावातील नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. त्याचप्रमाणे हा विजय अत्यंत संघर्षातून मिळालेला आहे व कांद्री हि नगरपंचायत झाल्यामुळे मोठ्ठा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने कांद्रीच्या विकासासाठी कुठलाही निधी अपुरा पडू देणार नाही, असे आमदार आशिष जयस्वाल यांनी आश्वस्त केले आहे. (दि.26डिसेंबर 2022)